कर्जत: मिनाक्षी साळुंकेंचा पराभव तालुक्याच्या लागलाय जिव्हारी The defeat of Meenakshi Salunke is the jewel of the taluka
गद्दारीची परंपरा’ निघणार का मोडीत; डिल ठरते बसुन एकाच गाडीत
कर्जत :दिलीप अनारसे
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा पं. स. माजी सभापती मिनाक्षी साळुंके यांचा केवळ एका मताने झालेला पराभव तालुक्याच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. मतदारसंघ असो किंवा तालुक्याच्या प्रत्येकच निवडणुकीत होत असलेले पक्षांतर्गत राजकारण जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही लपुन राहिले नाही.त्यामुळे या गलिच्छ राजकारणाची चर्चा तालुक्यातील गावागावांत रंगत आहे.सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी कायम मदतीला धावून येणारे कुटुंब म्हणुन ‘साळुंके कुटुंब’ अशी प्रत्येकाशी नाळ जोडुन त्यांनी तालुक्यात आपले वेगळेच वलय निर्माण केले आहे.पराभवानंतरही त्यांच्या भेटीसाठी होत असलेली तालुक्यातून गर्दीची रिघ साळुंके यांच्यावर असलेल्या प्रेमाची पावतीच आहे.विजयाची संधी अगदी निश्चित असताना घरच्यांकडुनच घरच्यांना पराजयाचा मिळालेला हा आहेर धक्का देणारा असला तरी भविष्यातील निवडणुकीत असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची वरिष्ठांनी दखल घेणे आता तेवढेच गरजेचे आहे.सर्वसामान्यांना दाखवण्यासाठी पक्ष वेगळे मात्र वैयक्तिक स्वार्थासाठी ही मंडळी एकाच गाडीत बसून आपली डिल करत असल्याची चर्चाही रंगत आहे.सध्या सोशल मिडियावरही अनेकांच्या अकाउंटवरून कुणाचेही नाव न घेता ‘गद्दार’ हा शब्दप्रयोग वापरून अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.कोणतीही निवडणुक प्रक्रिया एकदा पार पडली की गुलालाची उधळण होते.कोणाचा तरी जय-पराजय ठरलेला असतो,मात्र मिनाक्षी साळुंके यांच्या पराभवाची चर्चा तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आ.रोहित पवार यांचा शब्द बडे-बडे नेते टाळत नाहीत हे सर्वसृत असले तरी त्यांच्याच गोटात राहून त्यांनाच चकवा देणाऱ्यांवर आ. रोहित पवार हे काय कारवाई करणार?याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.जिल्हा बँकेचा हा निकाल म्हणजे खुद्द आ.रोहित पवारांना व्यथित करणारा आहे याच्या मुळाशी जाऊन आ.रोहित पवार हे काय भुमिका घेणार हे जाणुन घेणे सर्वांसाठी औत्सुक्याची बाब आहे.
_________________________________
सुपारी घेऊन पक्ष संपवण्याचा हा प्रयत्न!
तालुक्यातील बडे नेते आपली पोळी भाजण्यासाठी आ.रोहित पवारांनाच शह देण्याचा प्रयत्न करत आहेत का?पक्षात राहूनच सुपारी घेऊन त्यांना तालुक्यातील पक्ष संपवायचा आहे का? राष्ट्रवादीचे नेते आ.रोहित पवार यावर नेमकी काय कारवाई करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली.