श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा, पुणे-नगर परिसरात महापूराचा धोका !

0

Imageअहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण सूचना

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ३१५.१० मि.मी. सरासरी पर्जन्याचे ७०.३२% पर्जन्यमान झालेले आहे. दि. २५ जुलै २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये खालीलप्रमाणे विसर्ग सुरू आहे:

अ.क्र.नदीचे नावठिकाणविसर्ग (क्युसेक)
गोदावरीनांदूर मध्यमेश्वर धरण८,८०४
भिमादौंड पुल४९,५९०

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा प्रभाव

पुणे जिल्ह्यात दि. २४ जुलै २०२४ रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे खडकवासला आणि इतर धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भिमा नदीला दौंड पुल येथे मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत बंडगार्डन, पुणे येथे १,०५,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आज, दि. २५ जुलै २०२३ रोजी रात्री दौंड पुल येथे भिमा नदीचा विसर्ग १,००,००० ते १,५०,००० क्युसेक होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

गोदावरी नदीतील परिस्थिती

नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

नागरिकांना आवाहन

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे अहमदनगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जीवितास धोका उद्भवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४ वा २३५६९४० वर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *