Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Pune : जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश.

0

पुणे: एचएनडी बोर्डिंगच्या बहुचर्चित व्यवहार प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी मोठा निर्णय दिला आहे. जैन समाजाच्या मनाप्रमाणेच हा व्यवहार दोन्ही बाजूंनी रद्द करण्यात आला असून, या निर्णयाने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती ट्वीट करत दिली आणि या यशाचे श्रेय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. “होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद, मा. देवेंद्रजी!” अशा शब्दांत मोहोळ यांनी आपली भावना व्यक्त केली.

या प्रकरणात आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांनी बोर्डिंगला भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनावर प्रतिसाद देत मी स्वतः बोर्डिंगला भेट देऊन भगवान महावीर आणि आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले, असे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यावेळी समाज बांधवांशी संवाद साधताना मोहोळ यांनी, ‘समाजाच्या मनात जे आहे, तसाच निर्णय घेतला जाईल’ असा शब्द महाराजजींसमोर दिला होता. विशेष म्हणजे, महाराजजींनी १ नोव्हेंबर, २०२५ पासून आमरण उपोषणाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर, १ तारखेच्या आतच हा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन मोहोळ यांनी जैन समाजाला दिले होते. हा व्यवहार रद्द व्हावा, यासाठी मोहोळ यांनी मा. देवेंद्र फडणवीस आणि संबंधित विविध घटकांशी सातत्याने संवाद साधत प्रामाणिक प्रयत्न केले, ज्याला आजच्या निकालाने यश मिळाले आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये जैन समाजासोबतच्या आपल्या ३० वर्षांच्या जुन्या नात्यावरही प्रकाश टाकला. ‘मी जैन समाजासोबत आहे आणि जैन समाज माझ्यासोबत,’ असे मी सुरुवातीपासून सांगत होतो, कारण माझं समाजासोबत असलेलं नातं, हे आजचं नाही, तर गेल्या ३० वर्षांचं आहे, असे मोहोळ म्हणाले. या विषयात पुण्यातील जैन समाजातील कोणत्याही व्यक्तीने त्यांच्यावर अविश्वास दाखवत वैयक्तिक आरोप केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, काही राजकारण्यांनी स्वार्थासाठी हेतुपुरस्कर त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करत बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही मोहोळ यांनी केला. तरीही त्यांच्या आणि समाजातील नात्याला तडा जाण्याची शक्यता नव्हती, यावर त्यांनी जोर दिला. जैन समाज बांधवांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

एकूणच, धर्मादाय आयुक्तांच्या या निर्णयाने जैन समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली असून, मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वपूर्ण भूमिकेमुळे हा गुंता सुटल्याचे चित्र आहे. मुरलीधर मोहोळ यांनी समाजाचा विश्वास सार्थ ठरवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, ‘जय जिनेंद्र!!!’ असे सांगत आपले ट्वीट संपवले आहे.

Follow Us
Leave A Reply

Your email address will not be published.