Ashadi ekadashi 2025: आषाढी एकादशी २०२५ ,कधी आहे आणि काय आहे तिचे महत्त्व ?
पुणे, ०३ जुलै २०२५: हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाणारी आषाढी एकादशी (Ashadi ekadashi 2025 marathi ) २०२५ मध्ये 6 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. वारकरी संप्रदायासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व असून, पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) याच दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने पूर्ण होते.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘आषाढी एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ (Devshayani Ekadashi) असेही म्हटले जाते. या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेला जातात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या चार महिन्यांच्या कालावधीला ‘चातुर्मास’ (Chaturmas) असे म्हटले जाते. चातुर्मासात विवाह किंवा इतर शुभ कार्ये केली जात नाहीत, तर या काळात धार्मिक कार्ये, व्रत-वैकल्ये आणि उपासना यांना विशेष महत्त्व दिले जाते.
आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत ही वारी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. या दिवशी विठ्ठल मंदिरात विशेष पूजा आणि विधी केले जातात. भाविक उपवास करतात, भजन-कीर्तन करतात आणि विठ्ठलाच्या नामाचा गजर करतात.
या दिवशी उपवास केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. आषाढी एकादशी हा दिवस आध्यात्मिक वाढ, आत्म-चिंतन आणि भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.