देशभरातील २४ लाख आणि महाराष्ट्रातील अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या टांगणीला लागले आहे. प्रशासकीय यंत्रणांच्या कारभारामुळे २१ जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेसाठी (NEET Re-exam) आता प्रवासाचा खर्चही विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री लावणार का? याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी मोठी मागणी केली आहे.
इतर राज्यांनी दाखवली तत्परता, महाराष्ट्र कधी?
पंजाब, हरियाणा आणि बिहार सारख्या राज्यांनी नीट पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधीच मोफत बस प्रवासाची घोषणा केली आहे. या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्याची गरज व्यक्त होत आहे. ‘जर इतर राज्ये हा स्तुत्य निर्णय घेऊ शकतात, तर महाराष्ट्र का नाही?’ असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवारांची नेमकी मागणी काय?
रोहित पवार यांनी ट्वीट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रताप सरनाईक आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, २१ जून रोजी महाराष्ट्रातील एसटी बस (MSRTC), महानगरपालिकांची बससेवा आणि मेट्रो सेवा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात यावी. यामुळे ग्रामीण भागातून शहरात परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक भार हलका होईल.
रेल्वे प्रवासाबाबतही केंद्राला विनंती
केवळ राज्यापुरते मर्यादित न राहता, अनेक विद्यार्थ्यांना लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचा आधार घ्यावा लागतो. यासाठी केंद्र सरकारने देखील रेल्वे प्रवास मोफत करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती पवारांनी अश्विनी वैष्णव यांना केली आहे. नीट पुनर्परीक्षेचा हा निर्णय विद्यार्थ्यांवर लादला गेला असल्याने, त्यांना किमान प्रवासाची सुविधा तरी मोफत मिळावी, असा सूर उमटत आहे.
नीट परीक्षेच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शैक्षणिक नुकसान आधीच झाले आहे. आता किमान प्रवासाची सोय मोफत करून सरकारने त्यांना दिलासा द्यायला हवा. तुम्हाला काय वाटते? राज्य सरकारने रोहित पवारांची ही मागणी तातडीने मान्य करायला हवी का? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की नोंदवा.
